ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगचा पुढाकार; वक्फ मंडळासमोर विविध मागण्या

औरंगाबाद: ऑल इंडिया उलमा बोर्डच्या मुतवल्ली विंगच्या वतीने महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान यांचा सत्कार करून विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनामध्ये वक्फ संस्थांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. त्यामध्ये नवीन नोंदणी प्रकरणे, प्रलंबित सुनावण्या, मुतवल्ली नियुक्त्या तसेच वक्फ संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित विविध प्रश्नांचा समावेश होता. याशिवाय महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळामध्ये आवश्यकतेनुसार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि वक्फ मंडळाच्या सुनावणीदरम्यान “क्लोज फॉर ऑर्डर” ठेवण्यात आलेल्या प्रकरणांचे आदेश लवकरात लवकर जारी करावेत, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी फैयाज खान यांनी उपस्थित मुतवल्ली व पदाधिकाऱ्यांना आश्वासन देत सांगितले की, मांडण्यात आलेल्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी कार्यक्रमास वक्फ बोर्डाचे अध्यक्ष खुसरो खान, शेख फैसल इक्बाल (मुतवल्ली, बीबी का मकबरा), सय्यद सादात दगाचे, उस्मान हबीब खान, शाकीर चिश्ती, सय्यद फहीमुद्दीन शुतारी, रहीम खान, सय्यद कलीमुद्दीन शुतारी, शेख मुजीब मुजावर (पैठण), अश्रफ खादरी (परभणी), शेख अजीज, शेख शमशुद्दीन अमीनुद्दीन यांच्यासह विविध वक्फ संस्थांचे मुतवल्ली, खादिम, मुजावर आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




