कमी मार्क मिळाल्याने १९ वर्षीय मुलीची पित्याकडून हत्या
पुण्यातील बिबेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना

पुणे : नुकताच एसएससी बोर्डाचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थी उज्ज्वल भविष्याची स्वप्ने घेऊन परीक्षेला सामोरे गेले होते. यात अनेक विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळाले नाही.
अशातच पुण्यातील बिबेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून संतापलेल्या पित्याने आपल्या १९ वर्षीय मुलीची भिंतीवर डोके आपटून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
घटनेची माहिती मिळताच बिबेवाडी पोलीस स्टेशन यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आरोपी पित्याला बेड्या ठोकल्या. या अमानुष कृत्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
मुलांच्या भविष्याची चिंता करणे योग्य असले तरी त्यांच्या मनावर अपेक्षांचे ओझे लादणे चुकीचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता वेगळी असते. गुण कमी मिळाले म्हणजे आयुष्य संपत नाही; उलट त्यांना आधार, समजूत आणि प्रोत्साहनाची गरज असते.



